नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ किंवा MSRTC च्या एका अतिशय गाजलेल्या योजनेची माहिती जिचं नाव आहे आवडेल तेथे प्रवास योजना (Avdel Tithe pravas yojana).
मंडळी आवडेल तेथे प्रवास योजना (Avdel Tithe Pravas yojana) ही खरतर खूप जुनी योजना आहे म्हणजे १९८८ साली ही योजना चालू करण्यात आली होती. पण त्यात वेळोवेळी बदल केले गेले आहेत. मग ते बदल तिकिटाच्या दरात केलेले असोत किंवा इतर कुठले असोत. पण ही योजना प्रवाश्यांमध्ये खूप गाजली.
मंडळी याचा फायदा खास करून फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना होतो. उदाहरणार्थ, ज्यांना कोकण फिरायचं आहे ते हा पास काढतात आणि मस्तपैकी कोकण ट्रिप करून येतात. कुणाला शेगाव शिर्डी करायची असते. पास काढतात आणि जाऊन येतात. अशी अनेक उदाहरण आहेत.
तसंच, एसटीचा प्रवास सगळ्यात सुरक्षित असतो आणि या पासमुळे प्रवासी कितीही गाड्या बदलू शकतो. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही प्रवास करता येतो पण अट एकच, गाडी आपल्या एसटी महामंडळाची पाहिजे.
Table of Contents
आवडेल तेथे प्रवास योजनेचे काही नियम (Rules of Avdel Tithe Pravas yojana)
- या योजनेत पासचे दोन प्रकार आहेत. ७ दिवसांचा पास आणि ४ दिवसांचा पास.
- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) अशा बससाठी चालतील. तसंच हा पास आंतरराज्य मार्गांवरही ग्राह्य राहील. साध्या पासमध्ये शिवनेरी, शिवशाही, आराम किंवा निमआराम बस मधून प्रवास करता येणार नाही.
- निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाहीत. शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गावरही ग्राह्य राहील. थोडक्यात दोन्ही प्रकारच्या पासवर आंतरराज्य प्रवास करता येईल फक्त बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस आधी काढता येईल. म्हणजे पास आयत्यावेळी काढला पाहिजे असं काही नाही. १० दिवस आधी पण काढता येईल.
- या पासवर नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये सुद्धा प्रवास करता येईल. फक्त नियम २ आणि ३ प्रमाणे, साध्या बसचा पास साध्या प्रकारच्या बसला म्हणजे साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) या गाड्यांना चालेल आणि शिवशाही चा पास शिवशाही बससेवेसह साधी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी या गाड्यांना चालेल.
- या पासवर प्रवास करता येईल पण गाडीत गर्दी असेल तर बसायला जागा मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे पासधारकांनी आधी रिझर्वेशन करून जागा आरक्षित केल्यास गाडीत जागा मिळण्याचा प्रश्नही सुटेल. याबाबतीत पासधारकांना फक्त आरक्षणाचे पैसे भरावे लागतील. संपूर्ण तिकिटाचे पैसे भरायची गरज नाही.
- या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकांना ३० किलो व १२ वर्षाखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल. म्हणजे आत्ता सांगितलेल्या मर्यादेपर्यंत सामान गाडीतून पासधारकांनी नेलं तर त्याचे वेगळे लगेज चार्जेस घेतले जाणार नाहीत.
- पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल. म्हणजे पासधारक गोवा, कर्नाटकातील काही खास स्थळं इत्यादी या पासद्वारे फिरून बघू शकतात. फक्त गाडी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे.
- पास हरविल्यास त्या ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही किंवा हरविलेल्या पासचा कोणताही परतावा दिला जाणार नाही. म्हणजे एकदा पास हरवला कि पैसे गेले.
- सदर पास अहस्तांतरणीय राहील म्हणजे ज्याच्या नावावर पास आहे त्यांनीच तो वापरायचा. पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल. म्हणजे तुमच्या पासवर दुसराच कोणी प्रवास करतोय असं आढळलं तर पास जप्त होईल.
- प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही. थोडक्यात पासचा उपयोग प्रवास करायला होईल. आपल्या वस्तूची किंवा सामानाची जबाबदारी आपापली राहील. त्याची जबाबदारी महामंडळ घेणार नाही.
- आवडेल तेथे प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल. म्हणजे तुमच्या पासची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे तर तो पास त्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
- जर महामंडळाची गाडी बंद पडली किंवा काही अपरिहार्य कारणामुळे बसला उशीर झाला आणि तुमच्या पासची मुदत मधेच संपली तर याबाबतीत तुम्हाला तिकीट काढावं लागणार नाही पण प्रवास तुम्हाला त्याच बस ने करावा लागेल किंवा बस कंडक्टर ने दुसऱ्या बस मध्ये बसवून दिल तर त्याच्या परवानगीने चालू शकेल. पण हे बस कंडक्टरवर अवलंबून राहील.
- घरातील नातलगाचा मुत्यू, भुकंप, आग लागणे, आतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकाला पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविल पाहिजे. तसं केल्यास प्रत्येक पासमागे रु.२०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रक्कम पासधारकाला परत देण्यात येईल. तसेच त्याच पासवर पुढील तारखेला प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असेल तर त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात येतो आणि त्यासाठी कुठलेही शुल्क घेतलं जात नाही. म्हणजे एकतर पैसे परत मिळतील किंवा पासची तारीख बदलून मिळेल. फक्त हे पासची तारीख सुरु होण्याआधी करायला हवं.
- संप / काम बंद आंदोलन यामुळे महामंडळाची वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी दिलेल्या पासावर प्रवास करू शकला नाही तर त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल. आणि ही मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्या पासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल. त्यांनतर म्हणजे ३ महिन्यानंतर पासधारक मुदतवाढ / परतावा मागायला गेला तर तो मिळणार नाही.
- स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.
आवडेल तेथे प्रवास योजनेतील पासच्या किंमती (Pass prices of Avdel Tithe Pravas yojana)
वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य प्रौढ मुले प्रौढ मुले साधी (साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह २०४० १०२५ ११७० ५८५ शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह ३०३० १५२० १५२० ७६५
(वर दर्शविलेले मुलांच्या पासाचे दर ५ वर्षापेक्षा जास्त व १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.)
मंडळी,आत्ता वर जे टेबल दिसतंय त्यात एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास या योजनेसाठीचे दर दिलेले आहेत. यामध्ये ७ आणि ४ दिवसांचे पास उपलब्ध आहेत. साधी बस आणि शिवशाही असे गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत आणि लहान मुले म्हणजे ५ ते १२ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढ प्रवाश्यांसाठी वेगळे दर आहेत.
साध्या बसचा पास ७ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला २०४० रु आणि लहान मुलांना १०२५ रु दर पडेल आणि साध्या बसचा पास ४ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला ११७० रु आणि लहान मुलांना ५८५ रु दर पडेल.
शिवशाही बसचा पास ७ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला ३०३० रु आणि लहान मुलांना १५२० रु दर पडेल आणि साध्या बसचा पास ४ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला १५२० रु आणि लहान मुलांना ७६५ रु दर पडेल.
पण मंडळी इथे गोष्ट आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कि या पासच्या किमतीवर इतर कुठलीही सवलत लागू होत नाही. म्हणजे जर आपल वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा आपलं वय ६५ ते ७५ च्या दरम्यान असेल किंवा आपण महिला प्रवासी असाल तरी आपल्याला पासची संपूर्ण किंमत द्यावी लागेल त्यावर कुठलीही सवलत मिळणार नाही.
खरं म्हणजे ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाश्याना पासची गरजच नाही कारण त्यांना प्रवास मोफत आहे. तसंच ६५ ते ७५ च्या दरम्यान वय असलेल्या प्रवाश्यांना आणि महिलांना सुद्धा पासची गरज नाही कारण त्यांना तसही अर्ध तिकीट आहे. त्यामुळे हा पास सामान्य प्रवाश्यांसाठी आहे ज्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नाही.
तर मंडळी, आज आपण बघितली एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास (Avdel Tithe pravas scheme) या योजनेची माहिती. आपण या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि हक्काने म्हणा वाट पाहीन पण एसटीनेत जाईन. धन्यवाद.